जैनधर्म - व्यक्तिस्वातंत्र्य व स्वावलंबन
एकेंन्द्रियापासून
ते पंचेंद्रियांपर्यंत प्रत्येक प्राणी हा स्वतंत्र आहे. त्याची निर्मिती ईश्वराने
केली नाही त्यामुळे ईश्वर त्याचा नाश ही करू शकत नाही. त्याचे अस्तित्व व
उत्पत्तीची- नाशाची प्रक्रिया
हा वर्षानुवर्षे सुरू असलेल्या व्यवस्थेचा एक भाग आहे. त्याच्या हातून काही चांगले
घडले वा वाईट घडले तरी त्याला तो स्वतः वैयक्तिकरित्या जबाबदार आहे. ईश्वराचा
त्यात कसलाही सहभाग नाही.अडचणींच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा व सुखप्राप्तीचा
उपाय ज्याचा त्यालाच करावयाचा आहे म्हणजे स्वावलंबनानेच तो आपला आत्मविकास साधू
शकतो. स्वातंत्र्य गमावणे-पारतंत्र्य भोगणे म्हणजे काम – क्रोधादि विकारांना बळी पडणे. आणि स्वतंत्र्य मिळविणे म्हणजे काम – क्रोधादि विकारांवर ताबा मिळविणे. हा ताबा श्रद्धा आणि ज्ञानार्जनासाठी
आवश्यक आहे. आपले सुख किंवा दूःख, ज्ञान किवा अज्ञान यास दुसरे कोणी जबाबदार नाही.
जिवनाचा विकास साधायचा तो स्वतः प्रयत्न करून आणि जिवनात अवनती आली तरी त्याला
स्वतःचीच कृत्ये जबाबदार. त्यामुळे घडणाऱ्या घटनांचा कर्ता-धर्ता इतरत्र वा दुसरा
कोणी हे जैनधर्माला मान्य नाही.
जगातला प्रत्येक
सजीव घटक आपल्या बऱ्या-वाईटाचा, हित-अहिताचा स्वतःच निर्माता आहे. म्हणजे स्वतःचा
ईश्वर स्वतःच आहे. पण विचाराच्या गोंधळामुळे, इतर संस्कारांमुळे परंपरा आणि
अंधश्रद्धा यांच्यामुळे त्याला हे स्वयंभू स्वातंत्र्य लक्षात येत नाही. हे
स्वातंत्र्य एकदा त्याच्या लक्षात आले, स्वतःच्या सत्वाची खरी ओळख झाली की मग
आत्मजागृती हाच खरा सुखाचा मुलमंत्र आहे हे त्याला जाणवते. ईश्वर म्हणजे आपल्याहून
वेगळा असा कोणी नाही तर आत्म्याच्या (चैतन्याच्या) शुद्ध स्वभावरूप अवस्थेचे नाव
आहे.
अशारितीने जैन
वा श्रमण संस्कृती ही व्यक्तिस्वातंत्र्य व स्वावलंबनावर आधारलेली आहे. विश्वातल्या
प्रत्येक व्यक्तित ईश्वरियगुणांचा समुच्चय वा चैतन्यशक्तिचा एकत्रित साठा आहे.
उन्नतिच्या दिशेने मार्गक्रमण करावयाचे असेल तर वाईटातून चांगल्याकडे(शुभतेकडे),
चांगल्यातून अतिचांगल्याकडे (शुद्धतेकडे) वाटचाल करावी लागते. यालाच निकृष्टातून
निघून(निवृत्ती) व ऊत्कृष्टतेकडे प्रस्थान(प्रवृत्ती) असे म्हंटले आहे. हा
पलायनवाद नव्हे तर आदर्श जिवनपद्धती आहे. याला पलायनवादच म्ङणायचे असेल तर असे
आदर्श पलायन करूनच रामदासांनी दासबोधासारखा अलौकिक ग्रंथ लिहीला, बुद्ध आणि
ख्रिस्तांनी मानवता टिकविली, बाबा आमटे आणि मदर तेरेसा यांनी अलौकिक लोकसेवेच्या
माध्यमातून, कर्मवीर भाऊराव पाटील आणि ज्यातिबा फुले यांनी क्रातिकारी
लोकशिक्षणातून, संत तुकाराम आणि गाडगेबाबा यांनी केलेल्या कडकडीत लोकजागरातून - निकृष्टातून
ऊत्कृष्टाकडे जाण्याची वाट आपआपल्यापरिने सुगंधीत केली हे विसरून कसे चालेल.