बुधवार, डिसेंबर ३१, २०२५

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल काय? काळानुरूप समाजात जे प्रश्न निर्माण झाले असतील त्या प्रश्नांच्या अनुषंगाने ऊहापोह करीत त्या प्रश्नावर उपाय सुचवले गेले असतील. लोकांची मानसिकता आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यातून बाहेर पडण्याचे दिशा दर्शन केले गेले असेल. त्यामुळे एका तिर्थंकरांचा उपदेश हा त्याआधीच्या वा त्यानंतरच्या तीर्थंकरांच्या उपदेशासारखाच तंतोतंत असेल असे समजण्याचे कारण नाही. मूळ तत्वे तीच राखून कालपरत्वे दोष आणि त्या दोषांचे परिणाम दाखवून देऊन त्यातून वस्तूंच्या स्वभावाचा धर्म सांगितला गेला असेल. हे जर तीर्थंकरांच्या बाबतीत घडत असेल तर त्या नंतरच्या आचार्यांच्या बाबतीतही घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाचे गुण,माणसांची वृत्ती, सवयी, कालपरत्वे आचरणात आलेले दोष, आक्रमणे आणि नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे माणसाला बदलावे लागतेच. कारण कठीण परिस्थितीत समस्यांशी झुंजत टिकून राहणे हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे अस्तित्व आणि आपत्ती यांच्या झगड्यात अस्तित्व टिकवण्यासाठी धर्माच्या काही मुलगुणांना मुरड घालने क्रमप्राप्त होते. अशा परिस्थितीचा विचार काळानुरूपच करावा लागतो. त्या त्या काळातील माणसाची बुद्धी, बुद्धीवर विविध कारणांनी चढलेले गंज, आचरणात कारणपरत्वे आलेले शैथिल्य या गोष्टी नजरेसमोर ठेवून ऐकणारा- विचार करणारा -प्रेक्षक -गृहस्थ आणि त्याची मानसिक अवस्था लक्षात घेऊन त्याला उपदेश करणे भाग असते. काळानुरूप ज्या गोष्टी सामान्य गृहस्थाच्या बाबतीत घडतात त्या, त्या काळात कार्यरत असलेल्या उपदेशकाच्या बाबतीतही घडणार हे ओघाने येते . गुरु, उपदेशक, साधू,आचार्य या सर्वांच्याच बाबतीत ही गोष्ट घडत असते. आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या प्रवचनातून, उपदेशातून आणि रचनेतूनही उमटत राहणार. या सगळ्या व्यामिश्र परिस्थितीतून समाजाला बाहेर काढून मूळ धर्माचाराकडे परत आणायचे तर त्यासाठी धर्माचाराची विविध रूपे , मुलगुणात केले गेलेल बदल, तात्विक विचारांच्या मांडणीत झालेले बदल हे सगळे या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे. हा भेद समजून घेतला तर वस्तुस्थितीचे यथार्थ दर्शन व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे अधिकच्या संशोधनास चालनाही मिळते. मतभेद असणे ही काही सर्वथा चुकीची गोष्ट नाही. महावीरांच्या नंतर जे अनेक आचार्य झाले त्यांनी, महावीरांचा उपदेश लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले. श्रुतज्ञानाच्या माध्यमातून सुरुवातीला एकाकडून दुसऱ्याकडे हे ज्ञानाचे हस्तांतर केले गेले. हे करत असतानाही सगळेच आचार्य काही त्या हस्तांतर प्रक्रियेला असामान्य आणि तंतोतंत करण्याएवढे प्रज्ञावंत असतीलच असे नाही.कारण काळाचा महीमा त्यांनाही लागू होणारच.त्यामुळे पुढच्या पिढीकडे हे ज्ञान हस्तांतरित करताना काही महत्त्वाच्या गोष्टी निसटून गेल्या असतील.काही सांगण्या ऐकण्याच्या प्रक्रियेत चुकीने काही वेगळेच नोंदवले गेले असेल. माणसांचे स्वभाव, त्याच्या मनाची चंचलता, परिस्थितीवश आलेले अवगुण,अभिमान आणि अहंकार,आणि श्रेष्ठत्वाची भावना हे कुणालाही चुकलेले नाही. यातील काही अवगुणांच्या कारणाने लहान सहान बदल घडले नसतीलच असे समजण्याचे कारण नाही. आक्रमणे व कत्तलीच्या घमासानीत दबावाने काही गोष्टी बळजबरी मांडल्या गेल्या असणार हेही मध्ययुगाच्या काळाच्या पार्श्वभूमीवर पहिले तर दिसेल.त्यासाठी कुणाला दोष देऊन किंवा त्याचा दुस्वास करून किंवा व्यक्तिगत व सांप्रदायिक कट्टरता बाळगून, किंवा वाद निर्माण करून काही कळणार नाही. समजून घ्यायचे असेल तर सगळी झापडे बाजूला करून मोकळ्या मनाने घटना, काळ आणि परिस्थिती यांचा मागोवा घ्यावा लागेल. जैन दर्शनात मुनींच्या साठी मुलगुन आणि उत्तर गुण यांचे प्रतिपादन आहे तसेच गृहस्थांसाठीही गुणांचे प्रतिपादन केले आहे. या मुलगुणांचे आचरण साध्य झाले की उत्तर गुणाचे आचरणही सहज साध्य होते. श्रावकांसाठी मुलगुणाची संख्या आठ आहे. 'रत्नाकरंडक श्रावकाचार' यात आचार्य समंतभद्र यांनी या गुणांचे प्रतिपादन खालील प्रकारे केले आहे. ‌ 'मद्यमांसमधुत्यागैः सहाणुवरतपंचकम् । अष्टौ मूलगुणानाहूर्गृहिणां श्रयणोत्तमाः ॥ मद्य, मांस,मध, यांच्या त्यागासहीत पाच अनुव्रतांचे पालन केल्यास त्यांना गृहस्थाचे अष्टमूलगून म्हणतात. पाच अनुव्रतात स्थूल हिंसा,खोटेपणा, चोरी, कुशील, आणि परिग्रह या पाच गोष्टीपासून मुक्त होण्याचे प्रयोजन आहे. श्री जिनसेन आचार्य यांनी जे आदिपुराण लिहिले त्यात, आचार्य समंतभद्र यांनी वर प्रतिपादलेल्या अष्टगुणापासून फारकत घेऊन बदल केला आहे. त्यात जिनसेन यांनी मधुत्याग हटवून त्याठिकाणी द्युतत्याग समाविष्ट केले आहे. पं. आशाधरजी यांनी सागारधर्मामृतमधे मूलगुणांचं वर्णन करतेवेळी जिनसेनाचार्यांचा खालील श्लोक उद्धृत केलाय. हिंसासत्यस्तेयादब्रह्मपरिग्र हाच्च वादरभेदात् । द्यूतान्मांसान्मद्याद्विरतिर्गृहिणोऽष्ट सन्त्यमी मूलगुणाः ॥ जिनसेन यांनी असे का केले हे समजायला मार्ग नाही. तज्ञांच्या मते हा श्लोक आदिपुराणाच्या काही प्रतींमधे आहे आणि काही प्रतींमधे नाही. दक्षिणेत ज्या प्रदेशात या आचार्यांचा निवास होता त्या प्रदेशात द्यूत जास्त प्रमाणात प्रचलित असणार व त्यामुळे समाजाचे होणारे भयंकर नुकसान व व्यसनांधता वाढली असण्याचा संभव आहे. त्यामुळे असा बदल करणे गरजेचे झाले असण्याची शक्यता आहे. मधुत्याग तसेच ठेवून जास्तीचे द्यूत त्याग वाढवल्याने आठ या संख्येस बाधा येऊ नये म्हणून मधू त्यागाला वगळावे लागले अशीही शक्यता आहे. किंवा काही आणखीही कारण असेल. इतर कोणत्याही प्रधानआचार्यांनी अष्ट मुलगुन यांचे प्रतिपादन करताना मधू त्याग वगळलेले दिसत नाही किंवा द्यूत त्यागाचा समाविष्ट मुलगुन यात केल्याचे दिसत नाही. 'यशस्तिलक' चे कर्ते श्री सोमदेवसूरी हे, तीन मुलगून- मद्य, मांस, मध यांचा त्याग- असलेले समंतभद्र यांचे प्रतिपादन स्वीकारतात. मात्र त्याच वेळी समंतभद्र यांच्या पाच अनुव्रतांना श्री सोमदेवसूरि मूळ गुण मानत नाहीत, स्वीकारत नाहीत. त्याऐवजी पाच औदुंबर फळांचा समावेश त्या ठिकाणी करतात. आणि लिहितात की आगमात या प्रमाणे गृहस्थाचे आठ मुलगुन सांगितले आहेत. " मद्यमांसमधुत्यागाः सहोदुम्बरपंचकैः । अष्टावेते गृहस्थानामुक्ता मूलगुणाः श्रुते ॥ 'पंचाध्यायी' चे कर्ते आचार्य यांचीही हिच भूमिका आहे. या आठ मूलगूणांशिवाय श्रावक होता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे. मद्यमांसमधुत्यागी त्यक्तोदुम्बर पंचकः । नामतः श्रावकः क्षान्तो नान्यथापि तथा गृही ॥ २-७२६ ॥ P 'पुरुषार्थसिद्ध्युपाय' चे कर्ते श्री अमृतचंद्रसुरि हे ही या मताला पोषक आहेत. पण त्यांनी अहिंसा व्रताचा उल्लेख करताना याचे प्रतिपादन केलेले आहे, त्याला मुलगुन अशी संज्ञा दिली नाही. या आठ गोष्टींचा त्याग केल्यानेच शुद्ध बुद्धी लोक जीनधर्म पाळण्यास पात्र असतील असे म्हटले आहे. मद्यं मांसं क्षौद्रं पंचोदुम्बरफलानि यत्नेन । हिंसाव्युपरतकामैर्मो क्तव्यानि प्रथममेव ॥ ६१ ॥ अष्टावनिष्टदुस्तरदुरितायतनान्यमूनि परिवर्ज्य I जिनधर्मदेशनाया भवंति पात्राणि शुद्धधियः ॥ ७४ ॥ वरील तिन्ही ग्रंथांच्या मधील जी अवतरणे दिली आहेत त्यातून हे स्पष्ट होते की या आचार्यांनी 'पाच अनुव्रत' च्या ठिकाणी 'पाच उंबरिय फळांचा त्याग' असे म्हटले आहे. त्यामुळे या आचार्यांचे प्रतिपादन समंतभद्र आणि जिनसेन यांच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे हे जाणवते. पाच अनुव्रतांचा भाव आणि पाच औदुंबर फळांच्या त्यागाचा भाव याची मुल्यांच्या दृष्टिकोनातून तुलना होऊच शकत नाही. पाच प्रकारच्या औदुंबर फळांचा त्याग हे मांस त्यागाच्या अंतर्गत येतेच.कारण या फळात सहज डोळ्यांना दिसणारे जीव जंतू यांची हालचाल स्पष्ट होते. यांच्या भक्षणात मांस भक्षणाचा दोष आहे. अशा परिस्थितीत मांस त्यागाचे मुलगुन असताना वेगवेगळ्या पाच फळांचे परत वेगळा उल्लेख करण्याने व त्यांना पाच मुलगुणांच्या बरोबरीने मानण्याचे काय प्रयोजन होते हे समजत नाही. पण ही विलक्षण गोष्ट आहे हे नक्की. अशा प्रकाराचा बदल हा काही साधारण बदल नसतो. याचा काही विशेष अर्थ असतो. मात्र यामुळे मुलगुणांचे वजन अतिशय हलके केले गेले हे जाणवत राहते.आणि त्याचवेळी मूलगूणांची व्याप्ती व आवाका वाढल्याचे दिसते. हे करून श्रावक वा जैन गृहस्थ या संज्ञेला पात्र असलेल्यांची संख्याही वाढते. अमूक एक, श्रावक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा हा सोपा मार्ग शोधला गेल्याचे दिसते. वेगवेगळ्या विचारप्रवाहांच्या आणि वादविवादाच्या जमान्यात ज्यावेळी मुळ गृहस्थ धर्माची, श्रावकाची मूलगूणं अडचणीची ठरु लागली असतील, त्यावेळी सगळ्याच लोकांना जैन श्रावक या एकाच झेंड्याखाली एकत्र आणण्याच्या उद्दिष्टाने मुळ मूलगूणांचे स्वरुप बदलणे ही काळाची गरज ठरली असणार. आणि सर्वसाधारण मूलगूणांचे प्रयोजन झाले असेल. व्रती आणि अव्रती या दोघांनीही ही सर्वसाधारण मूलगूणं पाळावीत हा सोपेपणा आणला गेला. 'पंचाध्यायी' मधील खालील पद्यावरुन तरी असेच दिसून येते. " तत्र मूलगुणाश्चाष्टौ गृहिणां व्रतधारिणां । क्वचिदव्रतिनां साक्षात् सर्वसाधारणा इमे ॥ २-७२३ ॥ 'उपासकाचार' चे कर्ते श्री अमितगति आचार्य यांनी मूलगूनात 'रात्री भोजन त्याग' या आणखी एका गुणाचाही समावेश केला आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत..... बंधनं ढिली करुन बौद्ध धर्मासारखे लोकसंख्येने समाज वृद्धी करणे, समाजाची संख्या वाढवणे हा एक उद्देश्य काळानुरुप ठरवून घेतल्या सारखे हे सगळे दिसते. दृष्टी, अपेक्षा,विषय,संख्या आणि तत्वे मांडण्याची पद्धत या सगळ्याच बाबतीत यांच्यात भेद दिसून येतात. त्यामुळे हे सगळे महावीरांच्या वाणीचे प्रतिपादन आहे असे समजणे अतिशयोक्त होईल. त्या त्या काळात आणि प्रदेशात निर्माण झालेले प्रश्न, शिष्यांची बौद्धिक आणि मानसिक प्रकृती व योग्यता नजरेसमोर ठेवून अशाप्रकारचा उपदेश- मांडणी-रचना केली गेली असे समजता येईल. अशा प्रकारचे भेद प्रशस्त- अप्रशस्त , सोपे-अवघड, अल्पकालिन- दूरगामी परिणाम करणारे अशा मुद्द्यांवर वेगळे काढता येतील व त्याची तुलनाही होऊ शकेल. त्याचवेळी या भेदांच्या अनुषंगाने, आचार्यांची वैचारिकता व त्या आचार्यांच्या, तत्कालीन विचारांवर असलेल्या भरवशावरही प्रकाश पडतो. संदर्भ - १.जैन हितैषी. ‌२.रत्नकरंडश्रावकाचार- ६६. ३.श्रावक के मूलगुणोंकी अवधारणा..डॉ.ऋषभचंद्र जैन,वैशाली इन्स्टिट्यूट रिसर्च बुलेटिन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...